जिल्ह्यात कोंबडबाजार, दारु, सट्टापट्टी, जुगार आधी अवैध धंद्यांना कधी नव्हे इतका उत आलाय. राजाश्रयाने हे अवैध धंदे सुरू असून चोरांच्या हातात तिजोरीच्या चाव्या असल्यामुळे शिरजोरी वाढणारच अशी नागरिकांची चर्चा आहे.पत्रकारांवर हल्ले होत आहेत, ड्रग्स प्रमाण देखील प्रचंड वाढले. नुकतीच जिल्ह्यातील सर्वात मोठी अवैद्य दारू ची कारवाई चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने झाली. या कारवाई करिता पोलीस निरीक्षक खाडे यांनी लोकप्रतिनिधीना उर्मट भाषा वापरली आणि आपले हात झटकून टाकले होते.
लोकप्रतिनिधीच्या तक्रारीला पोलीस प्रशासन गांभीर्याने घेत नाही. मात्र अकार्यक्षम पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांविरोधात लोकनियुक्त लोकप्रतिनिधींनी तक्रार दिल्यानंतर देखील राज्य सरकार कोणतीही कारवाई करत नाही. एकंदरीत सारे काही राजाश्रयाने होत असून पिसली जातेय ती आम जनता असेच भयान चित्र दिसते. जिल्ह्यात आता कायदा व सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिक अपक्ष आमदारांनी चंद्रपुरात सात गाड्या अवैध दारू पकडून दिल्यानंतरही राज्याच्या गृहमंत्र्यांना अवैध दारु तस्करीची ‘स्पेसिफिक केस’ हवी आहे. चंद्रपुरात काल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विविध कार्यक्रमात आपली हजेरी लावली. रात्री 9 वाजता त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बातचित करताना त्यांना सहाजिकच दोन दिवसांपूर्वी स्थानिक आमदारांनी सात अवैध दारूच्या गाड्या पकडल्याचे लक्षात आणून दिले. ही कारवाई करताना पोलिस अधिकाऱ्यांनी आमदारांशी उर्मट संवाद केल्याचेही सांगितले. त्यावर बोलताना गृहमंत्र्यांनी ‘स्पेसिफिक केस’ द्या, असे पत्रकारांना सांगितले व आमदार जोरगेवार यांची लेखी तक्रार मिळाल्याचेही कबूल केले.
स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. या पाठिंबा देणाऱ्या लोकप्रतिनिधींसाठी सरकार किती संवेदनशील आहे, हे या विधानाने दिसून आले आहे. कालच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी आमदारांशी उर्मट संवाद केलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांना निलंबित करण्याची मागणी केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अधिकारी शिरजोर तर लोकप्रतिनिधी हतबल झाल्याचे चंद्रपूरच्या घटनेने सिद्ध केले आहे.
गृहमंत्री देशमुख यांच्या या वक्तव्याने पत्रकारही काही क्षणासाठी अवाक झाले होते, खुद्द गृहमंत्री पत्रकारांना प्रकरण मागतात म्हणजे, दारूची इतकी मोठी कारवाई झाल्यानंतर सुद्धा त्यांना प्रकरण हवंच म्हणजे जिल्ह्यातील अवैध धंद्यांना त्याचा पाठिंबा आहे की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे मंत्री शिवसेना, यंग चांदा ब्रिगेड आदी आपल्या सहकारी साथीदारांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करत नाही असे स्पष्ट झाल्याची चर्चा आहे.
