चंद्रपूर शहरातील कचरा संकलनाच्या कंत्राटात मनपाने आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप करीत काँग्रेसने सोमवारी महापालिकेच्या दारातच धरणे आंदोलन केले. निविदा प्रक्रियेत महानगर पालिकेतील सत्ताधारी भाजपने आर्थिक गैरव्यवहार केल्यानं या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
या धरणे आंदोलनावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष रामू तिवारी, अश्विनी खोब्रागडे, विनोद दत्तात्रय, चित्रा डांगे, नगरसेवक प्रशांत दानव सह काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
कचरा संकलनाचे जुने कंत्राट संपुष्टात आल्याने चंद्रपूर शहर महानगरपालिकेने कचरा संकलनासाठी निविदा मागितल्या. या कामासाठी मे. स्वयंभू ट्रान्स्पोर्ट, पुणे यांच्यासह अन्य पाच कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या. त्यातील दोन निविदा तांत्रिक पूर्तता न केल्याने रद्द करण्यात आल्या. उर्वरित चार निविदांत मे. स्वयंभूचा दर सर्वात कमी म्हणजे 1700 रुपये प्रतिमेट्रीक टन होता. यामुळं स्थायी समितीने या संस्थेला काम मंजूर केले.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेने शहरातील घर ते घर कचरा गोळा करणे, कंपोस्ट डेपोपर्यंत कचरा वाहतूक करणे, नाली सफाईचा कचरा वाहतूक करणे या कामासाठी निविदा मागितल्या होत्या. या कामासाठी मे. स्वयंभू ट्रान्सपोर्ट पुणे या कंत्राटदाराचा 1700 रुपये प्रति मेट्रीक टन हा सर्वात कमी दर होता.
त्यामुळे या कंत्राटदाराला दहा वर्षांसाठी कंत्राट मंजूर करण्यात आले. मात्र, नंतर मनपातील सत्ताधा-यांनी प्रशासनास नवीन प्रक्रिया राबविण्यास दबाव आणला. मंजूर कंत्राट रद्द करीत नवीन कंत्राटासाठी निविदा मागविण्यात आल्या.
यात मे. स्वयंभू ट्रान्स्प्रोर्ट या कंत्राटदाराने पुन्हा प्रति मेट्रिक टन 2552 रुपय दराची निविदा सादर केली. ही निविदा सर्वात कमी दराची असल्याने या कंत्राटदारास स्थायी समितीने कंत्राट मंजूर केले आहे. मात्र, जुन्या आणि नवीन दरात तब्बल साडेआठशे रुपयांची दरवाढ आहे. यामुळे मनपाला तब्बल कोट्यवधी रुपयांचा फटका सहन करावा लागणार असल्याने यासर्व प्रक्रियेची चौकशी करून कंत्राट रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले.
