खबरकट्टा / चंद्रपूर - राजुरा:
दीड महिन्यांपूर्वी राजुरा तालुक्यातील लक्कलकोट येथील एका शेतकर्यावर हल्ला करून ठार केलेल्या बिबट्याला अखेर बुधवार, 18 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास विरुर वनपरिक्षेत्रांतर्गत लक्कलकोट नियतक्षेत्रात जेरबंद करण्यात वनविभागास यश आले आहे.
मध्य चांदा वन विभागाच्या विरुर वनपरिक्षेत्र अंतर्गत लक्कलकोट वनक्षेत्रात दीड महिन्यापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू होता. त्यातच 3 डिसेंबर रोजी लक्कलकोट येथील एका शेतकर्यावर हल्ला करून ठार केले होते. शिवाय काही बकर्या फस्त केल्या होत्या. त्यामुळे वनकर्मचार्यांनी त्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रात्रंदिवस मोहीम सुरू होती. अखेर बुधवारी लक्कलकोट नियतक्षेत्राचे कक्ष क्रमांक 48 मध्ये ठेवलेल्या पिंजर्यात बिबट जेरबंद झाला. याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी देवराव पवार यांनी वरिष्ठ वनाधिकार्यांना दिली. या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून चंद्रपूरला हलविण्यात आले.
ही मोहीम उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी देवराव पवार, क्षेत्र सहायक मनोहर गोरे, शेख, सुरेश मांदाडे, रवी वैद्य, एस. जी. शिंदे, प्रिया लांडगे, नरेश लाडसे, तसेच पीआरटीचे पथक, कोष्टाळा शिबिरामधील वनमजुर, देवाडा, सिद्धेशवर येथील वनपाल वनरक्षक यांनी केली. हा बिबट जेरबंद झाल्याने वनकर्मचारी सोबतच जनतेनेही सुटकेचा निश्वास सोडला."

