खबरकट्टा/ चंद्रपूर:
गोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी गावावरून गेल्या चार-पाच दिवसांपासून विमान सारख्या घिरट्या घालत आहे. विमानातून नेमका कशाचा सर्व्हे केला जात आहे, असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. आकाशात विमान जवळून जाताना बघितले तर नागरिकांना त्याचे कुतूहल वाटणे स्वाभाविक आहे. परंतु कधी नव्हे इतक्या जवळून गोवरी गावावरून विमान गेल्या चार-पाच दिवसांपासून जात आहे. दिवसातून तीन चारवेळा हे विमान गावाच्या अगदी जवळून फेऱ्या मारत असल्याने नेमके हे विमान गावावरून कशासाठी घिरट्या
घालत आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
राजुरा तालुका विविध खनीज संपत्तीने नटलेला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात वेकोलीच्या भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. या कोळसा खाणी राजुरा तालुक्याच्या विकासात भर घालणाऱ्या आहे. कोळशाची वाढती मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करून गोवरी, सास्ती, पोवनी, गोयेगाव परिसरात कोळसा खाणींचे नव्याने निर्माण करण्यात येत आहे. वेकोलीच्या याच परिसरातील गोवरी गावावरून विमान दररोज दिवसातून तीन-चार वेळा घिरट्या घालत असल्याने विमान दिसले की नागरिक कुतूहलाने त्याच्याकडे बघत आहेत.
